More Sensational News

Thursday, 22 December 2011

ब्रेकिंग न्यूजसाठी प्रामाणिकपणाशी तडजोड नको - राष्ट्राध्यक्षांचे आवाहन

मुंबई। दि. २२ (प्रतिनिधी)
लोकशाहीत प्रसारमाध्यमे हे प्रभावी साधन असते. भारतासारख्या जगातील सर्वांत मोठय़ा लोकशाहीमध्ये तर माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. पण, सध्या ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत पहिले येण्याच्या प्रयत्नात घटनांची सत्यता पूर्णपणे पडताळून न पाहता बातमी दिली जाते. या विषयाचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. या कामी या क्षेत्रातील आघाडीचा ग्रुप म्हणून लोकमतने या विषयावर विचारमंथन घडवून आणावे, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारांचे राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते शानदार सोहळ्यात वितरण झाले. या वेळी त्यांनी माध्यमांचे देशासाठी असणारे योगदान आणि माध्यमांचे बदलते रूप यावर चिंतनशील भाष्य केले. ‘ब्रेकिंग न्यूज’वर नाराजी व्यक्त करीत राष्ट्राध्यक्षांनी माध्यमे हा विचारी व्यवसाय म्हणून न वाढता तो टीआरपीच्या रेटिंगवर वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याच वेळी त्यांनी लोकमतचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या की, लोकमत मीडिया ग्रुपच्या वृद्धीचा आलेख सतत वाढता असून, देशातील आघाडीच्या वृत्तपत्र समूहात त्यांची गणना होते.
त्या पुढे म्हणाल्या की, प्रसारमाध्यमे सार्वजनिक हिताचे विषय ठळकपणे मांडून सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचे काम करू शकतात. त्यासाठी माध्यमांनी प्रामाणिकता, वस्तुनिष्ठता आणि निष्ठा ही पत्रकारितेची तीन मूलभूत वैशिष्ट्ये लक्षात ठेवून काम केले पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड होता कामा नये.
माध्यमांची ताकद पूर्वीपासूनच मोठी होती; पण, आता नव्या दळणवळणाच्या तंत्रज्ञानामुळे, विविध जनसंपर्क माध्यमांच्या उदयामुळे ही ताकद अजून वाढली आहे. भारतीय वृत्तपत्र व्यवसाय ही जगातील दुसरी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे क्षेत्रही वेगाने वाढत असून, वाहिन्यांची संख्या पाहता आपण जगात चौथ्या क्रमांकावर आहोत. ज्याप्रमाणे माध्यमांचा आवाका आणि प्रभाव वाढेल तशी जबाबदारीही वाढणार आहे. मात्र, स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला वाट्टेल ते करण्याची मुभा असे जे गृहीत धरले जाते ते योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.
समाजाला सध्या स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, हुंडा, व्यसनाधिनता यांसारखे प्रश्न भेडसावत आहेत. मुलीपेक्षा मुलाला प्राधान्य देण्याची मनोवृत्ती बदलली पाहिजे. मुलगी ही मायेचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा पूल बांधणारी दोरी असते. तिला ममतेने सांभाळले पाहिजे. भारतीय समाजाने कुटुंब व्यवस्थेचा नेहमीच पुरस्कार केला आहे आणि त्यासाठी कौटुंबिक मूल्यांच्या भावमुद्रा आपल्या जीवनात कायम ठेवायला हव्यात, असे त्यांनी सांगितले.
हातात पैसा आला म्हणजे गरिबी दूर होईलच असे नाही. कारण, हातगाड्या चालवणारे, रिक्षाचालक तसेच मजुरांचा ४0 ते ५0 टक्के पैसा हा दारू, गुटखा, जुगार अशा व्यसनांवर उधळला जातो. हा पैसा खरेतर मुलांचा सकस आहार, शिक्षण व कल्याणावर खर्च करायला हवा. व्यसनाधिनता हा सामाजिक रोग आहे. हा प्रश्न फक्त एका मजुरापुरता र्मयादित नाही, तर समाजाच्या चिंतनाचा विषय आहे. आपण कोणतेही काम करीत
असलो तरीही या सामाजिक अजेंड्याकडेही लक्ष दिले.


असे आहेत पुरस्कार
आठ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रत्येकी देण्यात आलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे आहे. तर अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांना देण्यात आलेला पुरस्कार मानचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी पाच लाख रुपये रोख असा आहे.

समाजसेवा - पारोमिता गोस्वामी

विज्ञान-तंत्रज्ञान - डॉ. हिंमतराव बावस्कर

राजकारण- खा. राजू शेट्टी

उद्योग - हणमंत गायकवाड

क्रीडा - वीरधवल खाडे

मनोरंजन- शेख नासीर शेख नियाज

साहित्य - किशोर कदम (सौमित्र)

कला - बंडोपंत खेडकर

जीवनगौरव - दिलीप कुमार


आयबीएन लोकमतवर
हा देदीप्यमान पुरस्कार वितरण सोहळा तुम्हालाही थेट पाहता येईल आयबीएन लोकमतवर २४ डिसेंबरला रात्री ८.00 वाजता.